Tuesday, May 7, 2013

`वर्क फ्रॉम होम` नको रे बाबा !


संपर्क क्रांतीला सुरवात होऊन आता एक जमाना झालाय. संपर्काच्या माध्यमांमध्ये रोजचे बदल सुरूच आहेत. या नव्या माध्यमांमुळे कामाचं स्वरूप बदललं, वर्क कल्चरही बदललं. गेल्या काही वर्षात वर्क कल्चरमध्ये झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती हा भाग आता अनिवार्य राहिलेला नाही. कम्युनिकेशन क्षेत्रातल्या प्रगतीमुळे रिमोट ऑफिस ही संकल्पना पहिल्यांदा अस्तित्त्वात आली. ऑफिसला येऊन काम करण्याऐवजी कनेक्टिव्हिटी असेल अशा कुठल्याही ठिकाणाहून काम करणं शक्य झालं. वर्क फ्रॉम होमचा पर्याय खुला झाला आणि टेलिवर्किंग हा नवा शब्दप्रयोग रूढ झाला.
सुरवातीला या टेलिवर्किंगचं खूप कौतुकही झालं. कंपन्यांची ऑफिसवरची गुंतवणूक कमी झाली आणि कर्मचाऱ्यांसाठीही घरून काम करण्याची चांगली सोय झाली. कंपन्या आणि कर्मचारी दोघेही या व्यवस्थेवर सुरवातीला खूष होते. आता इथून पुढे टेलिवर्किंग हेच भविष्य राहणार असल्याचं बोललं जात होतं. पण गेल्या काही महिन्यातल्या घडामोडी पाहिल्यास टेलिवर्किंगचं प्रस्थ कमी होताना दिसतंय. घरी बसून काम करण्याचा पर्याय कंपन्या नाकारू लागल्यात आणि पहिल्यांदा आनंदाने तयार होणारे कर्मचारीही आता वर्क फ्रॉम होमला नको म्हणू लागलेत.
आयटी क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या याहूने गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांसाठी एक नोटीस काढून रिमोट वर्किंगला बंदी घातली. त्याआधीच गूगलकडून देखील अशाच प्रकारची बातमी आली होती. टेलिवर्किंग कमी करत असल्याचे संकेत गूगलच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिले होते. आमचे कमीत कमी कर्मचारी ऑफिसबाहेरून काम करणारे असतील, असं गूगलच्या अधिकाऱ्याने नुकतच जाहीर केलंय.
गूगल किंवा याहूसारख्या बड्या कंपन्यांचा कित्ता आता अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांनीदेखील गिरवायला सुरवात केली आहे. कर्मचाऱ्यांनी ऑफिसमधूनच काम केलं पाहिजे अशी अट घातली जात आहे. घरून काम करताना ते अपेक्षित गांभीर्याने होत नसल्याचं काही कंपन्यांचं निरीक्षण आहे. वर्क फ्रॉम होमला कंपन्यांकडून विरोध होण्याचं मुख्य कारण म्हणजे रिमोट वर्किंगमध्ये टीमवर्क राहात नाही. टेलिवर्किंगमध्ये कर्मचाऱ्यांनी एकत्र बसून अनौपचारिक चर्चा करण्याची शक्यता नसते. त्यामुळे प्रत्येकजण स्वतंत्रपणे काम करत राहतो आणि टीमवर्कचे फायदे मिळत नाहीत. कितीतरी वेळेला लंचटाईमध्ये अनौपचारिकपणे होणाऱ्या संवादातून नव्या कल्पना उदयाला येतात. एकमेकांमधला हा अनौपचारिक संवादच टेलिवर्किंगमुळे खुंटतो. ऑनलाईन संवादात एक प्रकारचा पोकळपणा असतो, असं कंपन्यांचे मत आहे. व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल यातून किमान अपेक्षित निष्पन्न होतं पण त्यापलिकडचं यश मिळण्याची शक्यताच नसते. म्हणून ऑफिसमधली प्रत्यक्ष उपस्थिती कंपन्यांना आवश्यक वाटायला लागलीयं.
कर्मचाऱ्यांच्या बाजूकडूनही वर्क फ्रॉम होमचं आकर्षण आता हळूहळू मावळायला लागलेय. हा पर्याय सुरवातीला सगळ्यांनाच सोयीचा वाटला होता. पण त्यातल्या गैरसोयी आता पुढे यायला लागल्यात. घरूनच काम केल्यामुळे कामाची वेळ एक ठराविक राहात नाही. कामांचे तास कधी कधी ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांपेक्षाही जास्त व्हायला लागतात. पुन्हा घर हेच ऑफिस असल्यामुळे आयुष्यात काही बदल मिळत नाही. तोच तोचपणा येतो. याला लोक कंटाळतात असं निरीक्षण कॅलिफॉर्निया युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात नोंदवलं गेलंय. अमेरिकेत सध्या २४ टक्के कर्मचारी रिमोट वर्किंग करतात. पण हा आकडा झपाट्याने खाली येण्याची शक्यता आहे.
अमेरिकेबरोबरच ब्रिटनमध्येही टेलिवर्किंगचं प्रमाण कमी होण्याची चिन्ह आहेत. कुटुंबवत्सल इंग्लिश माणसाने वर्क फ्रॉम होमचं सुरवातीला अगदी जोरदार स्वागत केलं होतं. ब्रिटनमधल्या तब्बल ५९ टक्के कंपन्या टेलिवर्किंगला मान्यता देतात. पण ते प्रमाणही कमी होऊ शकतं, असा लंडन बिझनेस स्कूलचा कयास आहे. लंडन बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी टेलिवर्किंग करणाऱ्यांचं सर्वेक्षण केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, सगळे टेलिवर्कर्स काही खूष नाहीत. वरीष्ठांच्या सतत नजरेसमोर नसल्यामुळे घरून काम करणाऱ्यांच्या बढत्या फारशा होत नाहीत. अनेकदा घरून काम करणाऱ्यांना काम तेवढंच पण पगार मात्र कमी दिला जातो. याशिवाय प्रमोशनच्या संधी डावलल्या जातात, असं या सर्वेक्षणादरम्यान इंग्लिश कर्मचाऱ्यांनी सांगितलंय.
तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी माणसा- माणसातला संवाद हा प्रत्यक्ष सहवासातूनच योग्य वळणावर येतो हे सिद्ध होतंय. संपर्कक्रांतीनं जग जवळ आलंय हे खरं पण माणसं एकमेकांपासून दूर होतील की काय अशी भीती निर्माण झालीय.

बिनपाण्याची !!!


महाराष्ट्रातल्या गावांगावांत पाण्यासाठी सुरू असलेली वणवण विविध माध्यमांतून बघितली की, यंदाच्या दुष्काळाची तीव्रता ध्यानी येतेय. पाऊस लांबला, कमी झाला यामुळे येणारं हे अवर्षण नव्हे. गेल्या कित्येक वर्षात शासकीय आणि वैयक्तिक पातळीवर दुर्लक्षित राहिलेला जलसंवर्धनाचा मुद्दा यावर्षीच्या दुष्काळाने  अधोरेखीत केलाय. मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रातल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीच जंगजंग पछाडावं लागतंय तिथे शेतीची काय कथा? शहरातल्या लोकांना मात्र दुष्काळाची थेट झळ पोचत नसल्याने या समस्येची तितकीशी जाणीव दिसत नाहीय. एकीकडे गावांत अशी बिकट अवस्था आहे तरीही शहरात आपल्या आसपास कपडे, भांडी, जनावरं, गाड्या, इमारतींच्या काचा धुण्यासाठी भरमसाठ पाणी नासणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. जलसंवर्धनासंबंधी अनभिज्ञता, पाण्याच्या मूल्याची जाणीव नसणं यातून हे घडतं. आपल्याकडे एकूण जलसाक्षरताच कमी आहे. दुष्काळाचा असा प्रश्न किंवा पाण्याचं दुर्भिक्ष काही फक्त आपल्या प्रांतात नाही. जगात असेही काही देश आहेत, ज्यांना पाण्याची टंचाई कायम जाणवत असते. मूळातच ते प्रांत पाण्याच्या दुर्भिक्षाचे. तरीही पाण्याच्या मूल्याची जाणीव असल्याने सामान्य माणूस पाण्याचा सुयोग्य वापर करत असतो. पाण्याविनाही हे देश प्रगती करत आहेत.
मुबलक पाणी नसूनही प्रगतीचा मार्ग शोधणारी राष्ट्रं मिड्ल ईस्ट अर्थात मध्य-पूर्वेत सापडतात. प्यायचं पाणीही विकत घ्यावं लागत असल्याने तिथली जनता पाण्याचं मोल जाणते आणि त्याप्रमाणेच वागते. वर्षभरातून एखाद- दोन वेळा झाला तर पाऊस पडतो या परिस्थितीची आपण कल्पना तरी करू शकू का? पण त्यामुळेच तिथे पाण्याचा अपव्यय टाळला जातो आणि पाण्याचा कमीत कमी वापर करावा लागेल असं तंत्रज्ञान विकसित करण्याकडे कल असतो. यासंदर्भात नुकतीच तिथल्या माध्यमातून आलेली एक बातमी लक्षवेधी ठरली. पाण्याशिवाय गाडी धुण्याचं सोपं तंत्र दुबईतील एका उद्योजकाने शोधून काढलंय. हा उद्योजक मूळचा भारतीय आहे हे विशेष.
ऋषी आणि सानुज कोहली या तरुण उद्योजक बंधूंनी वॉटरवाईज नावाने हा नवा उद्योग सुरू केलाय. फक्त एका स्प्रेच्या स्वरूपात येणारं द्राव आणि एक कापड यांचा वापर करून गाडी स्वच्छ करता येते. पाण्याचा थेंबही न वापरता गाडी स्वच्छ होते आणि वर पॉलिश केल्यासारखी चकाकीही आणली जाते. पाण्याचं दुर्भिक्ष असल्याने या प्रकारच्या उद्योगांना तिथलं सरकारही पाठिंबा देतं.
सुरवातीला केवळ हा स्प्रे तयार करून तो कारवॉशिंग कंपन्यांना विकायला कोहली बंधूंनी सुरवात केली होती. पण नंतर ग्राहकांना थेट सेवा देऊनच याचा प्रसार करण्याचा निर्णय घेऊन कारवॉश कंपनी सुरू केली. हा स्प्रे गाडीवर मारून तो मायक्रोफायबर कापडाने पुसल्यानंतर गाडी धुतल्यासारखी स्वच्छ होते, असा कंपनीचा दावा आहे.
कोहली बंधू फक्त कारवॉशच्या व्यवसायावर थांबले नाहीयतं. स्वतःला इको आंत्रप्रेन्यर्स म्हणवून घेत ते आता इतर सफाईची कामं पाण्याशिवाय कशी करता येतील, याचं तंत्र विकसित करत आहेत. मोठमोठ्या उंच इमारतींची काचेची तावदानं धुण्यासाठी पाण्याचा एक थेंबही लागणार नाही, असं एक तंत्र ते सध्या विकसित करत आहेत. दुबईतल्या गगनचुंबी इमारतींच्या काचा आधुनिक तंत्रानुसार धुण्याचं पेटंट घ्यायचाही त्यांचा विचार आहे.
कोहली बंधूंनी त्यांच्या वडिलांचा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय पुढे नेण्याबरोबरच हे वॉटरलेस वॉशचं नवं तंत्रज्ञान विकसित केलं आणि बघता बघता वॉटरवाईजचं चांगलंच बस्तान बसलं. सध्या दुबईतल्या कार वॉश मार्केटपैकी ४० टक्के मार्केट वॉटरवाईजने काबीज केलंय, असं एक बातमी सांगते. केवळ पाच कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन सुरू केलेली कंपनी आज बरीच मोठी झालीय.
आपल्या देशातही अशा काही नव्या तंत्रांची गरज आहे. पण गोड्या पाण्याचा साठा अमर्याद नाही, याची जाणीवजागृती करणं हे त्याआधीचं काम. कारण त्यातूनच असे नवे प्रयोग स्फूरू शकतील. चिरंतन विकासाच्या दृष्टीने आधी जलसाक्षरता ही महत्त्वाची पायरी आहे.

Thursday, January 10, 2013

जागतिकीकरणाची नवी संस्कृती

ब्रिटनमध्ये गेल्या वर्षी झालेल्या जनगणनेचे आकडे नुकतेच जाहीर झाले आणि त्यातल्या काही आकड्यांमुळे कट्टर इंग्लिश जनतेला थोडा धक्काच बसला. मूळ ब्रिटीश नसलेल्या नागरिकांच्या संख्येत गेल्या दहा वर्षात ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचं हे आकडे सांगतात. इंग्लंड आणि वेल्समधील ७५ लाख लोकसंख्या जन्माने ब्रिटीश नाही. इंग्रजांच्या देशात ३० लाख घरे इंग्रजीखेरीज इतर भाषा बोलणारी आहेत. २००१ च्या जनगणनेच्या वेळी ८७ टक्के जनता ‘व्हाईट ब्रिटीश’ म्हणून गणली गेली होती. आता या मूळ रहिवाशांची संख्या फक्त ८० टक्क्यांवर आलीय. ब्रिटनबाहेर जन्मलेले आणि आता इथले नागरिक झालेले सर्वाधिक लोक लंडन परिसरात राहतात. इंग्रजी राजधानीच्या काही भागात तर मूळचे ब्रिटीश नागरिक अल्पसंख्याक झालेत असं या ताज्या जनगणनेतून उघड झालं आहे. स्थलांतरितांसंदर्भातील नियम आणि धोरण असंच सुरू राहिलं तर येत्या काही वर्षात ब्रिटनचा एक नवाच चेहरा समोर येईल, अशी भीती इथल्या मूळ रहिवाशांना आता वाटू लागलीय.

बाहेरच्या देशांतून इथे स्थलांतरित झालेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या आपल्या भारतीयांची आहे आणि त्याखालोखाल पाकिस्तानी नागरिकांची आहे. हा आशियायी नागरिकांचा ओघ गेली ४ दशके सुरू आहे. त्याआधी इंग्लंडमध्ये आयर्लंडमधून आलेल्या लोकांनी ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर बस्तान बसवलं होतं. नॉनब्रिटिश लोकसंख्येत सर्वाधिक आयरिश होते. ती जागा नंतर आशियायी नागरिकांनी घ्यायला सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे गेल्या दहा वर्षात सर्वात अधिक स्थलांतर गोऱ्या युरोपीय नागरिकांचंच झाल्याचं दिसतं. पोलंडहून इंग्लंडला स्थायिक झालेल्यांची संख्या गेल्या दशकात अचानक वाढलीय. युरोपीय युनियनमध्ये पोलंडच्या समावेशानंतर ही संख्या वाढली. पाच लाखांवर पोलिश नागरिक सध्या इंग्लंड आणि वेल्समध्ये राहतात.

जनगणनेचे आकडे आता जाहीर झाले असले, तरीही गेल्या काही वर्षांपासूनच परप्रांतीयांना पोसतात म्हणून इथल्या सत्ताधिकाऱ्यांना वाढत्या रोषाला सामोरं जावं लागतय. २००८- ०९ च्या आर्थिक वर्षात ब्रिटनला मंदीची झळ बसली होती. त्याचा परिणाम म्हणून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि बेकारी वाढली. आता काही ब्रिटीश राजकारणी याचं खापर परप्रांतातून वाढलेल्या स्थलांतरितांवर फोडत आहेत. या राजकीय दबावातूनच दोन वर्षांपूर्वी व्हिसाच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले. ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी मिळणारा टियर वन व्हिसा सहजासहजी मिळणं बंद झालं. इमिग्रेशनसंदर्भातील काही प्रक्रिया आणखी कडक करण्यात आल्या. ब्रिटीश प्रशासनाने यापूर्वी केलेल्या हलगर्जीपणातून अनेकांनी बेकायदा स्थलांतर केलय. शेकडो नागरिक नियम धाब्यावर बसवून देशात आले आणि आता ते यशस्वी व्यवसाय करून श्रीमंत बनले आहेत. (यात सर्वाधिक संख्या आशियायी नागरिकांची आहे) या संदर्भातील बातम्या, लेख आता स्थानिक वृत्तपत्रांतून, ब्लॉगवरून प्रसारित होत आहेत. अशा प्रकारे स्थानिकांच्या मनात रोष निर्माण झाला तर त्यातून प्रांतवाद आणि वंशद्वेश बळावण्याचा धोका असतो. ती भीती आता उघड बोलली जातेय. परप्रांतीय हा सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला महत्त्वाचा मुद्दा ब्रिटनच्या राजकारणातही कळीचा ठरणार अशी चिन्ह दिसताहेत.

एका बाजूला अशा प्रकारे वंशद्वेशाची, प्रांतवादाची भीती वाटत असतानाच जागतिकीकरणाचं एक नवीन रूप मात्र हळूहळू उलगडत असल्याचं याच आकड्यांतून पुढे येतय. ब्रिटनच्या या ताज्या जनगणनेतून समोर आलेली एक ठळक बाब म्हणजे परप्रांतीयांच्या या लोंढ्यांबरोबर एक नवी संस्कृती देशात रुजू पाहतेय. जागतिकीकरणाच्या लाटेनंतरचे बदल आता ठळकपणे दिसू लागले आहेत. स्वतःची ओळख मिश्र वंशीय सांगणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. धर्म हा मुद्दा अजूनही जनगणनेत महत्त्वाचा मानत असले तरी जागतिकीकरणाच्या जमान्यात निधर्मी जनतेची संख्या वाढतेय. आपण कोणताही धर्म मानत नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या ब्रिटनमध्ये गेल्या दशकभरात दुपटीने वाढली आहे. ही महत्त्वाची सांस्कृतिक घडामोड असल्याचं ब्रिटीश ह्युमॅ्युमॅनिस्ट सोसायटीचं मत आहे. ताज्या जनगणनेवेळी ‘नो रिलीजन’ असं सांगणाऱ्यांची संख्या १ कोटी ४० लाख झाली आहे.

वंश, धर्म यावरून येणारी ओळख नाकारणारे वाढले आहेत, तसेच पारंपरिक प्रांतीय, भाषिक ओळखही महत्त्वाची न मानणारी पिढी निर्माण होत आहे. महानगरांमधलं तिचं अस्तित्त्व लक्षात घेण्याएवढं वाढलय. ‘इंडिपेंडंट’मध्ये आलेल्या वृत्तानुसार, बहुतांश लंडनकर आता स्वतःला ‘इंग्लिश’ म्हणवून न घेता ‘ब्रिटीश’ म्हणणं पसंत करतात.

सांस्कृतिक बदलांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जीवनशैली. नव्या पिढीचं राहणीमान, जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच समाजातील अविवाहितांची संख्या विवाहितांपेक्षा अधिक झाली आहे. याला कारण अधिकाधिक तरुण जोडपी लग्नाच्या बंधनात न अडकताच एकत्र राहणं पसंत करताहेत. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्यांचं प्रमाण वाढलय. आता ब्रिटनमधल्या विवाहितांची संख्या केवळ ४७ टक्के एवढीच राहिली आहे. तब्बल ३५  टक्के जनतेने आपण ‘सिंगल’ असल्याचं सांगितलं आहे. या एकटं राहण्यामागच्या कारणांचा वेध घेतला असता काही तज्ज्ञांनी याला संपर्कक्रांती जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे एकत्र जगण्याची वेगळी गरज कदाचित उरलेली नाही. एकट्यानं राहणंच सोयीचे वाटू लागलं आहे, असं या तज्ज्ञांना वाटतं. समलिंगी संबंधांना समाजात हळूहळू स्थान मिळत असल्याने त्याची संख्याही वाढलेली दिसते. अशा प्रकारे एकलाखांवर समलिंगी व्यक्ती या देशात आता एकत्र राहताहेत, असंही जनगणनेचे आकडे सांगतात.

या आकडेवारीच्या विश्लेषणावरून आणि त्यामागे दडलेल्या कारणांचा विचार करता हा विषय ब्रिटनपुरता राहिलेला नाही हे निश्चित. केवळ एका देशाच्या जनगणनेचे आकडे यापेक्षा याचा आवाका मोठा आहे. धार्मिक, वांशिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांचे वारे कोणत्या दिशेला वाहताहेत हे यातून पुरेसं स्पष्ट होताना दिसतय. जागतिकीकरणाच्या या नव्या संस्कृतीचे आपण सगळे साक्षीदार होतोय.... खरं तर आपणच ती संस्कृती घडवतोय.



(मेनका जानेवारी २०१३ अंकाच्या नजरेपलिकडचे या सदरामध्ये हा लेख प्रथम प्रकाशित झाला आहे.)